जयगड : अंगणवाडीतील सहा महिने ते तीन वर्षे वयोगटांतील बालकांसाठी नावीन्यपूर्ण पूरक पोषण आहार या योजनेचा शुभारंभ रत्नागिरी तालुक्यातील जयगड-बागवाडी अंगणवाडी केंद्रात करण्यात आला. जयगडच्या ग्रामआरोग्य, पोषण, पाणीपुरवठा व स्वच्छता समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध कमलाकर साळवी यांच्या हस्ते पोषण आहाराचे वाटप करण्यात आले.
या वेळी बालकांसाठी गहू, मसूरडाळ, तूरडाळ, मटकी, मूगडाळ, मीठ, हळद, मिरची, खाद्यतेल आदी साहित्य बंद पिशव्यांतून वितरित करण्यात आले. या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सदस्या स्नेहा रवींद्र झगडे, माजी सदस्या प्रमिला अनंत झगडे, शिवसेना शाखाप्रमुख नारायण चंद्रकांत काताळकर, युवासेना कार्यकर्ते अथर्व अनिरुद्ध साळवी, अंगणवाडी सेविका वैष्णवी विश्वास पवार, अंगणवाडी ताई अपर्णा जयंत झगडे, शिवसैनिक रिंकेश मारुती झगडे आदी मान्यवर तसेच पालक उपस्थित होते.
या वेळी अनिरुद्ध साळवी यांनी या योजनेची माहिती उपस्थितांना दिली. अंगणवाडी सेविका पवार यांनी मुलांमधील लोह कमतरता दूर करणाऱ्या गोळ्या आणि सिरप आदी सुविधासुद्धा दर सोमवारी आणि गुरुवारी देण्यात येणार असल्याचे सांगून ही जबाबदारी ‘आशा’ आरोग्यसेविकांवर असून, याही योजनेचा लाभ बालकांना काळजीपूर्वक देण्याचे आवाहन पालकांना केले. मुलांची उंची आणि वजन यांची नोंद काळजीपूर्वक घेण्यासाठी शासनाने अंगणवाडीत उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. त्याचे प्रात्यक्षिक मान्यवरांसमोर करून दाखविण्यात आले.